विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्याने महायुतीला सत्ता मिळाली. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवून दिले. त्यानंतर शरद पवार गटातील काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या सातत्याने चर्चा होऊ लागल्या. विधानसभेतील अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबतच्याही चर्चांना उधाण आले आहे.
अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवशी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निवडणूक निकालानंतर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिल्याने कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम झालेला असू शकतो. त्यातच महत्त्वाचे नेतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधत असतील तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणे अटळ आहे. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले काही नेतेच तिकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले, असे म्हणत जयंत पाटील यांनी संबंधितांना सुनावल्याची माहिती आहे.
आमदार जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याचे बोलले जाते. याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चावरही जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही, जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो असे पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.