निकषबाह्य अन् अपात्र ‘लाडक्या बहिणीं’चे पैसे सरकार परत घेणार? आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. मात्र त्यावेळी सर्रास सरसकट सगळ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता निकषबाह्य अर्थात अपात्र असलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार असल्याची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. यावर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लाडक्या बहिणींचा लाभ परत घेण्याचा कोणताही निर्णय झाला नाही, असं वक्तव्य करत आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली. तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील बातम्या चुकीच्या असल्याचेही आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

‘ज्या महिला इच्छा प्रकट करताय की आम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र नाही आहोत त्या साडेचार हजार महिलांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रियेसंदर्भात समन्वय साधत आहोत. याव्यतिरिक्त कोणत्याही लाडक्या बहिणीचे लाभ परत घेण्यासंदर्भातील कोणताही निर्णय, चर्चा किंवा कारवाई देखील करण्यात आलेली नाही.’, असं आदिती तटकरे म्हणाल्या. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ 30 लाख अपात्र महिलांनी घेतला असून या सर्व महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी बातमी एका वृत्तपत्रातून देण्यात आली होती. यावर स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत.’, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय.