महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. एवढच नाही तर लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4000 हून अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा इन्फ्लूएंझा विषाणू सध्या मोठ्या चिंतेचे कारण ठरत आहे आणि 2025 मध्ये यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असं म्हटलं जातं आहे. हा इन्फ्लूएंझा म्हणजे H5N1 होय. पक्षी किंवा प्राण्यांमध्ये इन्फ्लूएंझाची प्रकरणे वाढू लागतात, तेव्हा मानवालाही त्याची लागण होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.
बर्ड फ्लू अर्थात एव्हियन इन्फ्लूएंझा हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. त्याच्या H5N1 प्रकारामुळे मानवांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो. तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर इतर प्राण्यांना आणि मानवांनाही परिणाम करू शकतो.
कारणे?
संक्रमित पक्ष्यांना स्पर्श केल्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने. तसेच संक्रमित प्राण्यांचे मांस किंवा अंडी खाल्ल्याने, कमी शिजवलेले मांस किंवा न उकळलेले अंडी खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. तसेच कच्च्या दुधाद्वारेही या आजाराचे संक्रमण होण्याची शक्यता आहे.
लक्षणे?
माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यावर ताप हे महत्त्वाचं लक्षण आहे. जास्त ताप आणि थंडी वाजून येणे. स्नायू दुखणे डोकेदुखी आणि थकवा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे, नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे, डोळ्यांत जळजळ होणे, पोटदुखी आणि अतिसार ही सर्व लक्षणे माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची आहेत.
काय करावे?
पक्ष्यांशी संपर्क टाळणे गरजेचे आहे. विशेषतः संक्रमित भागात पोल्ट्री उत्पादने पूर्णपणे शिजवल्यानंतरच खावीत. तसेच स्वच्छता पाळायला हवी आणि संक्रमित प्राण्यांपासून दूर रहायला हवे. हा आजार मानवांमध्ये दुर्मिळ आहे, परंतु संसर्ग झाल्यास तो गंभीर होऊ शकतो. त्याची लक्षणे सौम्य ते जीवघेण्यापर्यंत असू शकतात. म्हणून, जागरूकता बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच हा आजार महाराष्ट्रातून जाईपर्यंत तरी पक्ष्यांपासून अंतर ठेवणेच बरे आहे.
समजा कोणाच्या बाल्कनीत पक्ष्यांनी घाण केली असेल, किंवा त्यांची विष्ठा असेल तर ती लगेचच साफ करावी. यावेळी आपली स्वत:ची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्क घालावा जेणेकरून श्वासावाटे ते जंतू आपल्या शरीरीत जाणार नाही. तसेच ती जागा साफ करताना हातात नेहमी ग्लोज घालावेत. तसेच जागा साफ केल्यानंतर आपलं शरीर नीट स्वच्छ केलं पाहिजे.