Sangli News : किल्लेमच्छिंद्रगड येथील पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलल्याने तलाव, गावतळे पडले कोरडे

मुरूम, मातीची विक्री करून आर्थिक लाभ मिळवायचा या उद्देशाने बंधाऱ्याची बेसुमार खोली वाढविली

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली): सहा वर्षापूर्वी येथील गाव हद्दीत येणाऱ्या दहा माती नाला बंधारे आणि दोन सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी शास्त्रोक्त नियमाची अंमलबजावणी झाली नाही. मुरूम, मातीची विक्री करून आर्थिक लाभ मिळवायचा या उद्देशाने बंधाऱ्याची बेसुमार खोली वाढविली गेली.

खोली वाढल्याने मुरूमाचा थर उघडा पडला. परीणामी तलावात पाणी साचून राहण्याऐवजी पाणी तलावाखालून निघून जावू लागले. शासनाचे लाखो रुपये नाहक व्यर्थ गेले. चुकीच्या पद्धतीने गाळ काढण्याचे काम झालेल्या या बारा बंधाऱ्यात पाणी साचून राहण्यासाठी तळाला चिबडाच्या मातीचा थर देवून त्यावर रोलींग करणे गरजेचे आहे. तरच बारा बंधारे पाणी साठवणुकीसाठी उपयोगाचे ठरणार आहेत अन्यथा ते निरुपयोगी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.

सदर बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पाच वर्षापुर्वी जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. गाळ काढत असताना शासकिय नियमांची पायमल्ली झाली. काम कंत्राटी पध्दतीचा वापर करून करण्यात आले.

गाळ शेतीच्या वापरासाठी शेतकऱ्यांना देण्याचे शासकिय धोरण असताना तो रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना विक्री करण्यात आला. यामध्ये प्रशासकिय अधिकारी आणि तथाकथीत नेत्यांनी आपले उथळ पांढरे करून घेतले.

त्याची कटूफळे गेली पाच वर्षे गावास भोगावी लागत असून बारा बंधाऱ्यात बारा घागरीही पाणी साचत नाही अशी परिस्थिती आहे. बंधाऱ्यांचा वापर पाणी संचयासाठी आणि साचलेले पाणी टप्प्याटप्याने जमीनीत जिरून भुगर्भातील पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी बंधाऱ्यांची डागडुजी शासन स्तरावरून तातडीने व्हावी अशी येथील शेतकऱ्यांनी मागणी आहे.