शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १३६ गावांना फटका बसणार आहे.
विशेष म्हणजे या महामार्गाला प्रचंड विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचाही या अलाइनमेंटमध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १८ गावे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतील ६१ गावे यात समाविष्ट आहेत.राज्य रस्ते विकास प्रधिकरणाने पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळे प्रारूप आराखडे (अलाईनमेंट) तयार केले आहेत. पर्यावरण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने सादर केलेल्या ४८ पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे.
पहिल्यात टप्प्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ५५ गावे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १८ गावे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतील ६१ गावे, तसेच उर्वरित धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या टप्प्यात येत असला, तरी तुळजापूर तालुक्यातील दोन गावे पहिल्या टप्यात येत आहेत. पहिल्यासाठी तीन वेगवेगळ्या अलाइनमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १३६ गावे बाधित होणार असून १३४ गावे पश्चिम महाराष्ट्रातील, तर दोन गावे मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील आहेत.
सांगली जिल्ह्यातील बाधित गावे
शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नायगाव, कवठे एकंद, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी आदी.