इचलकरंजी शहरात अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, पाणी, वाहतूक याबाबतीत सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांच्या सोईस्तव व सार्वजनिक सुरक्षिततेकरिता महानगरपालिके मार्फत जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने बसविणेत आलेल्या आवाजी यंत्रणा (भोंगा) आज बुधवार, ता. १९ फेब्रुवारी पासून सकाळी ६ व रात्री १० वाजता वाजविणेत येणार आहे. इचलकरंजी शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. शहरातील उद्योजक व नागरिकांना वेळेचे जाणीव व्हावी यासाठी तत्कालीन नगरपालिकेच्यावतीने राणीबाग जवळील जलकुंभावरून पहाटे ६ वाजता व रात्री १० वाजता भोंगा वाजविण्यात येत होता. त्यामुळे या शहरातील नागरिकांना या भोंग्याची सवय झाली होती.
मात्र गेल्या काही वर्षापासून सदरचा भोंगा बंद अवस्थेत होता. शहरातील विविध संघटना नागरिक, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आदिंच्या मागणीवरून महानगरपालिकेच्यावतीने नव्याने जलशुध्दीकरण केंद्र येथे नव्याने भोंगा लावण्यात आला होता. गेल्या आठवड्यामध्ये त्याची चाचणीही घेण्यात आली होती. सदर भोंग्याबाबत नागरिकांकडून सुचना व हरकती ही मागविण्यात आल्या होत्या. अखेर आज बुधवार, ता. १९ पासून पहाटे ६ वाजता व १० वाजता भोंगा वाजविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.