छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा; आ. जयंत पाटील

काल सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. इस्लामपूर शहरात देखील अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेत दिल्लीश्वरांना आव्हान देत रयतेचे राज्य उभा केले. त्यांनी शेतकरी, महिलांची विशेष काळजी घेत रयतेला न्याय दिला. त्यांनी हे राज्य आपले आहे, ते जपायला हवे, वाढवायला हवे, ही भावना रयतेमध्ये निर्माण केली. त्यामुळे प्रत्येक मावळा आपला राजा व राज्यासाठी स्वतःचा जीव द्यायला सज्ज झाला होता अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

आ. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व महान कार्य आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. युवा पिढीने त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांचे गुण आत्मसात करावेत. महाराजांसमोर अनेक संकटे, आव्हाने उभा राहिली. मात्र, महाराज कधी डगमगले नाहीत. त्यांनी मावळ्यांना सोबत घेवून मोठ्या धैर्याने तोंड दिले इतिहास घडविला.