सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, वाहतूक, पाणी याबाबतीतील अनेक समस्या प्रश्न दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून केलेली फसवणूक व लोकप्रतिनिधींचे अज्ञान यामुळे रेंदाळ ग्रामपंचायतीकडे मंजूर झालेल्या ४ कोटी ९६ लाखाच्या जलजीवन मिशन योजनेचा कोणताही फायदा गावचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी होणार नसून गावचा पाणी प्रश्न संपवायचा असेल तर दूधगंगा नदीपात्रातून रेंदाळपर्यंत येणाऱ्या पाईपलाईन सहित सक्षम उपांगांची योजना झाली तर आणि तरच गावचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
रेंदाळच्या पायाभूत सुविधांसाठी, जिल्हा वार्षिक नियोजन समिती, अल्पसंख्यांक बहल मुलभूत पायाभूत सुविधा अंतर्गत, तसेच दलित वस्ती व नवबौध्द घटकांचा विकास या योजना अंतर्गत रेंदाळ येथे १ कोटी १२ लाख रुपये निधीच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी पाटील हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे रेंदाळ शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याचे व आपुलकीचे ऋणानुबंध जपण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीची विकासकामे गतिमान पद्धतीने करण्याची गरज आहे.
जलजीवन मिशन योजनेकरिता सुध्दा प्रयत्न सुरू असून गावच्या पाण्याची गरज भागविणारी तब्बल २५ ते ३० कोटी पर्यंतची सक्षम उपंगांची योजना राबवण्यासाठी कटिबद्ध असून गावच्या विकासासाठी एकरूप होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना उपसरपंच अभिषेक पाटील, शिक्षण सभापती रणजीत खोत, ग्रा.पं. सदस्य अविनाश घोडेस्वार, बांधकाम सभापती मुकूंद पतंगे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याचे सांगून कौतुक केले.