राज्य सरकारकडून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. ही नंबर प्लेट बसवल्यामुळे वाहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांनाच फायदा होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) म्हणजे, वाहनांसाठी बनवलेली एक नवीन प्रकारची नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट अॅल्युमिनियमपासून बनवली जाते. एचएसआरपी नंबर प्लेट्समुळे वाहनांची ओळख पटवणे सोपे होते आणि वाहन चोरीचा धोका कमी होतो. एचएसआरपी नंबर प्लेट्समध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. या नंबर प्लेटमध्ये छेडछाड प्रतिरोधक असते आणि त्यात पुन्हा वापरता येणार नाही असे कुलूप असते.
एचएसआरपी नंबर प्लेट्सचा मागोवा घेतला जाऊ शकतो आणि त्याचे निरीक्षण सहज करता येते. एचएसआरपी नंबर प्लेट्सची गरज वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, वाहन सुरक्षितता वाढवणे, तसेच त्यांची नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांवर सुद्धा आळा बसणार आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुलभ करणे असा आहे.
2019 च्या पूर्वी ज्या गाड्या आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे अशा वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावे लागणार आहेत. नागरिकांच्या तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी हा पाऊल सरकारने उचलेले आहे. सर्व वाहनधारकांनी लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याचे, आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी वाहनधारकांना केले आहे.