उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवेढा तालुक्यातील माचनूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. टाकळी येथील बंधाऱ्यात मंगळवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बुधवारी किंवा गुरुवारी हे पाणी बंद होण्याची शक्यता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ५६ टक्के आहे. पुढील आठ दिवसांत उजनी धरण निम्म्यावर येणार आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसली तरी नियमाप्रमाणे १० मार्चपासून उजनी मुख्य कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडले जाऊ शकते.
कालव्यातून उन्हाळी दोन आवर्तने मिळू शकतात. सध्या धरणात ५६.२१ टक्के पाणी पातळी आहे. भीमा नदीत पाणी सोडले त्यावेळी गेल्या सोमवारी ६३.८७ टक्के इतका होता. आठ दिवसांत दररोज एक टक्क्याप्रमाणे आठ टक्के पाणी घटले आहे. २६ डिसेंबर रोजी सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी १०३ टक्के पाणीसाठा होता. तर २९ डिसेंबर २०२४ रोजी उजनी धरणाची १०० टक्के पाणी पातळी होती.
१) सध्या सीना-माढा योजनेतून ३४२ क्युसेक तर दहिगाव योजनेतून १२० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर गेल्या सोमवारपासून उजनीतून भीमा नदीत ६ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
२) रब्बी हंगामातील उजनीतून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी १४ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले होते.
३) १० मार्चपासून उन्हाळी आवर्तन कालव्यातून सोडले जाण्याची शक्यता असून हे पाणी एप्रिल अखेरपर्यंत ४२ दिवसांची पाणी पाळी मिळणार आहे.
४) उजनीतून भीमा नदीत सोडलेले सोलापूर व नदीकाठचा गावांना हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे.
शेती पिकांसाठी पुढील तीन महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. रब्बी आवर्तन ४ जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. त्यावेळी उजनीत उपयुक्त ४९.७१ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या ३०.११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या एकूण ९३.७७ टीएमसी पाणी साठा उजनी धरणात आहे. ६३.६६ टीएमसी मृत साठ्यात धरले जाते.