शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या विट्यात तब्बल साडेचार हजार विकले यंत्रमाग, यंत्रमाग व्यवसायाला रामराम…..

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजी शहर प्रसिद्ध आहेच या ठिकाणी यंत्रमाग कारखान्यांची संख्या खूपच असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विटा शहरात देखील यंत्रमाग व्यवसाय खूपच जगजाहीर आहे. पण सद्या या व्यवसायाला उतरती कळा लागलेली आहे. वस्त्रोद्योगाबाबत केंद्र व राज्य अनिश्चित असलेले धोरण, सतत होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शहरातील साडेचार हजारांहून अधिक यंत्रमागाची विक्री झाली आहे. तर, काहींनी भंगारात घातले आहेत. उर्वरित तीन ते साडेतीन हजार यंत्रमाग अडचणींचा समाना करत सुरू आहेत. त्यांनाही कुशल कामगारांची टंचाई भासत आहे.

यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कपड्याला उत्पादन खर्चाशी निगडित दर मिळत नसल्याने यंत्रमागधारकांचे नुकसान होत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्ये शहरातील यंत्रमागधारकांनी लाखो रुपयांचे यंत्रमाग अक्षरशः २५ रुपये किलो दराने भंगारात विकले आहेत. अनेक वर्षे यंत्रमाग व्यवसाय नुकसानीत सुरू आहेत.

केंद्र शासनाच्या कापसाच्या खरेदीदाराच्या बाबतीतील धरसोड धोरणामुळे भारतातील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या दरापेक्षा जास्त राहात असल्यामुळे कापूस, त्यापासून निर्माण होणारे सूत, सुतापासून निर्माण होणारे कापड आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरापेक्षा महाग होत असल्याने निर्यात कमी झाली आहे. पर्यायाने देशांतर्गत बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने स्पर्धा होऊन दर कमी होतात. त्यामुळे नुकसान होते. महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर महागडे असल्याने उत्पादन खर्चात वाढ होते.

राज्य शासनाच्या सहकारी, खासगी, प्रादेशिक भेदभावामुळे निर्माण झालेली असमान पातळीवरची स्पर्धा, सततच्या आर्थिक नुकसानीमुळे विकेंद्रित साधे यंत्रमाग व सूत गिरण्या मोडकळीस आल्या असल्याचे यंत्रमागधारक सांगत आहेत. दरम्यान, काही यंत्रमागधारकांनी या व्यवसायाला रामराम करत विटा शहरात किराणा, हॉटेल, बेकरी यांसह छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेत. तर या यंत्रमागावर शेकडो कामगारांची रोजीरोटी चालत असे. अशा कामगारांवर मिळेल ते काम करून उपजीविका करण्याची वेळ आली आहे.