वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे तिघांवर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला; दोघांवर गुन्हा 

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे पूर्ववैमनस्यातून दोघांनी पारळी, गुप्तीने खुनीहल्ला केल्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. आशिष संभाजी कदम, अजित माणिक कदम, कुलदीप माणिक कदम अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी आशिष यांच्या फिर्यादीनुसार संभाजी रामचंद्र कदम, तेजस संभाजी कदम या संशयितांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मसुचीवाडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील चौकात आशिष याने चुलत भाऊ अजित, कुलदीप व संशयित संभाजी, तेजस यांच्यातील भांडणे सोडवली होती.

रविवारी सकाळी आशिष हा त्याच्या दूध डेअरीत थांबला होता. त्यावेळी भांडणे सोडवल्याच्या रागातून संभाजी व तेजस गुप्ती, पारळी अशी घातक शस्त्रे घेऊन डेअरीत घुसले. तेजस याने, ‘तू माझ्या भांडणामध्ये का पडलास, तुला मस्ती आली आहे, आज तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून हातातील पारळीने आशिष याच्या डोक्यात वार केला. संशयितांनी ‘आमची खूप पूर्वीची भांडणे आहेत, तू आमच्या भांडणात पडायचे नाहीस पडलास तर तुला संपवणार’ अशी धमकी दिली. आशिष जखमी झाल्याचे पाहून शिवीगाळ करीत ते निघून गेले. त्यानंतर आशिष याचा चुलत भाऊ अजित याच्यावरही गुप्तीने वार करून जखमी केले. कुलदीप याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.