शहरातील अतिक्रमण आणि त्यातून निर्माण झालेला फेरीवाल्यांचा प्रश्न हा एका गंभीर आजारासारखा बनुन राहिला आहे. नगरपालिका असल्यापासून अतिक्रमण आणि फेरीवाला त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी या संदर्भात तात्पुरत्या स्वरूपात जुजबी मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र त्या मोहिमेतून मोठे काही घडले नाहीत. त्याला अपवाद तत्कालीन मुख्याधिकारी शिवमुर्ती नाईक यांनी थोरात चौकातील उठवलेले अतिक्रमण आणि मुख्य रस्त्यावरील हटवलेला आठवडा बाजार. त्यानंतर मात्र कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली नाहीत.
फेरीवाला आणि अतिक्रमण या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. कोल्हापूर नाका ते गांधी पुतळा तसेच सांगली नाका, दुसऱ्या बाजूला पंचगंगा कारखाना नाका ते संभाजी चौक मार्गे नदी वेस नाका ही शहरातील दोन प्रमुख आणि मुख्य मार्ग आहेत. एक राज्यमार्ग आहे तर एक जिल्हा मार्ग आहे. याच मार्गावरून शहरातील ९० टक्के वाहतूक आणि दळणवळण चालते. परंतु या रस्त्याची आज अवस्था अत्यंत चिंचोळी बनली आहे रातोरात फेरीवाल्यांचे हातगाडे या मुख्य मार्गावर थाटले जातात आणि त्यांचा व्यवसाय सुरू होतो.
त्या हातगाड्यावर खाद्यपदार्थ घेण्यासाठी येणाऱ्यांची वाहनेही रस्त्यावरच पार्किंग केली जातात. त्यावर महानगरपालिका, शहर वाहतूक शाखेचे नियंत्रण नाही. याचे गांभीर्य महानगरपालिका प्रशासनाने ओळखले पाहिजे आणि त्या दृष्टीने काम केले पाहिजे. एखादी धडक मोहीम राबवून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण दूर करता येऊ शकते. याची चुणूक जरी महानगरपालिकेने दाखवून दिली तरी त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे.