आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने चिंचवड येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे जोरदार भाषण केले. त्यांनी महाकुंभ मेळाव्याचा उल्लेखल करत श्रद्धा अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे यांनी भाषणामध्ये महाकुंभ मेळ्याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, ‘मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार.’
राज ठाकरे यांच्यासाठी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभला जाऊन आल्यावर कमंडलूमध्ये पाणी आणलं होते. पण राज साहेबांनी ते पिण्यास नकार दिला. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘मला सांगा, पूर्वीच्या काळी ठिक होतं. आता सोशल मीडिया आला. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी. अरे कोण पेईल ते पाणी. चला आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले.
तिकडे जाऊन आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पुल पाहिले. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशातील नद्या स्वच्छ. ते काही माता म्हणत नाही. तरी नद्या स्वच्छ. आपल्याकडे पोल्युशनचं पाणी अस्वच्छ. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय गंगा साफ होणार. मध्ये राज कपूरने पिक्चर काढला. त्यात वेगळीच गंगा.’
राज ठाकरे यांनी श्रद्धा अंधश्रद्धा यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. ‘लोकं म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही अंघोळ करायला तयार आहोत. पण अजूनही गंगा साफ होत नाही. श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर या. डोके हलवा नीट. मी १२ तारखेला प्रत्येकाला जबाबदारी देईल. प्रत्येक पदाधिकारी तुम्हाला देईन. सर्व गोष्टी तुम्हाला उघडपणे सांगता येणार नाही. ही संघटनात्मक गोष्ट आहे. याचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजे’ असे राज ठाकरे पुढे म्हणाले.