खानापुरात होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र; आ. बाबर आणि आ. पडळकर यांच्या प्रयत्नाला यश

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. उपकेंद्र उभारणीसाठी १४१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणाही मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे मागणी केली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ही मागणी आग्रहीपणे मांडली.  त्यावर आमदार बाबर आणि आमदार पडळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह करत उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, अशी मागणी लावून धरली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत व्हावे, या मागणीसाठी जिल्ह्यातून विविध निवेदने आली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी अभ्यास समिती नियुक्त केली होती. समितीच्या अहवालानुसार विद्यापीठाने शासनाला प्रस्ताव पाठवला. खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, ही मागणी शासनाकडे आली आहे. जागेची उपलब्धता असल्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. यासाठी जवळपास १४१ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

केवळ उपकेंद्र करून चालणार नाही, काही पदविका आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत, यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल, असेही मंत्री पाटील यांनी जाहीर केले. आमदार बाबर म्हणाले, खानापूरला गायरान जमीन उपलब्ध आहे. त्याचे अधिगृहण करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी महत्त्वाची भूमिका घेत घोषणा केली. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असेही आमदार बाबर यांनी सांगितले आहे.