खानापुर येथे जमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर लाठ्या, दगड, क्रिकेट बॅट आणि विटांनी हल्ला करून दोघे गंभीर जखमी झाले, तर १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. खानापुरातील शाहूनगरमध्ये ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली. रात्री उशिरा दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, खानापुर येथील स्टेशन रोडवरील शाहूनगरमधील सर्व्हे क्र. ९३/अ १ मध्ये सिरॅमिक प्रॉडक्ट कारखान्याकडून १३८ कामगारांना प्लॉट वितरित करण्यात आले आहेत.
मात्र, या जागेलगत असलेल्या शाहूनगर वसाहतीतील ही जागा शासनाने आपल्यासाठी राखीव ठेवली असल्याचे स्थानिक डोंबारी समाजाकडून सांगितले जात आहे. कामगारांना या जागेत घरे बांधण्यासाठी त्यांच्याकडून विरोध केला जात आहे. जागेची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या कामगारांना अडविण्याचा प्रकार अनेकवेळा झाला आहे. सिरॅमिक प्रॉडक्ट लि. खानापूर या कौलांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यातील कामगारांना १६ एकर १७ गुंठे जागेतील १३८ प्लॉट देण्यात आले आहेत. हे प्लॉट त्यांच्या ताब्यात आहेत.
ते नगर पंचायतीला रीतसर मालमत्ता कर अदा करतात. भूखंडांचा कब्जा घेण्यासाठीचे पत्रही कारखान्याने त्यांना दिले आहे. तरीसुद्धा शाहूनगरवासीयांकडून या प्लॉटवर बांधकाम करण्यास विरोध केला जात आहे. याबाबत सिरॅमिक कामगारांनी शाहूनगरवासीयांच्या विरोधात खानापूर जेएमएफसी न्यायालयात दावा दाखल केला आहे. शाहूनगरवासीयांना सदर जागेत जाण्यापासून प्रतिबंध करत दाव्याचा निकाल लागेपर्यंत मनाई आदेश न्यायालयाने बजाविला आहे.