गिरीश महाजन यांना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी पाठवलं असेल तर दुसरं तिकडे कोणी जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमधील वाद दाखवत आहात. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देत आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत, असं सांगतोय. पण महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष काश्मीरच्या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेय वादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करताय, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. गिरीश महाजन यांना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी पाठवलं असेल तर दुसरं तिकडे कोणी जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमधील वाद दाखवत आहात. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देत आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत, असं सांगतोय. पण महाराष्ट्र सरकारमधले घटक पक्ष काश्मीरच्या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेय वादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करताय, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे हे पॅरालल गव्हर्मेंट चालवत आहेत का?
महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. काही जखमी तिथे अडकले आहेत. काही पर्यटक अडकलेले आहेत. सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असली पाहिजे. कुणीतरी एक माणूस गेला आहे तो हे सगळं हँडल करतोय. यापूर्वी सुद्धा आपण असे केलेले आहे. एकनाथ शिंदे हे पॅरालल गव्हर्मेंट चालवत आहेत का? देवेंद्र फडणवीस सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांचं ते ऐकायला तयार नाहीत, हे अत्यंत दुर्दैव आहे. या दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊ नये, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्राचं आणि देशाचं हसं होतंय
आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत. पण आम्ही म्हटले की, सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आमच्या मनात काश्मीरविषयी नक्कीच काही शंका आणि प्रश्न आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेविषयी, गृहमंत्र्यांच्या क्षमतेविषयी, आम्ही ते प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करू. पण आता ही वेळ ते करण्याची नाही. मतभेद दाखवण्याची नसून राष्ट्र एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, हे दाखवण्याची वेळ आहे. पण, महाराष्ट्राचे चित्र फार वेगळे आहे. खरं म्हणजे अमित शाह यांनी वरून गट्टा मारला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आहेत. शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. आम्ही कदाचित त्यांना दिल्लीत सांगू. तुमचा पक्ष काय करतोय पाहा, महाराष्ट्राचं आणि देशाचं हसं होतं आहे.
महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करतंय
संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार हे अडकलेल्या पर्यटकांची पूर्ण काळजी घेत आहे. महाराष्ट्र सरकारने येथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन यांना तिथे पाठवलेले आहे. पण, आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की, अनेक ठिकाणी संपर्क होत नाही, तिथे फोन लागत नाही. तिथे नेटवर्क प्रॉब्लेम नेहमीच आहे. कारण, तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं. कारण ते सीमावर्ती राज्य आहे. हल्ले होतात तेव्हा कम्युनिकेशनची व्यवस्था बंद केली जाते. त्याचा फायदा अतिरेक्यांना आणि दुश्मन राष्ट्रांना होतो. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारने जे काम सुरू केलेले आहे आणि माझ्या माहितीनुसार सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.
आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादाशी (terrorist)
काश्मीर मुद्द्यावर तुमचं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नक्कीच झालेले आहे. या घटनेचा निषेध म्हणून जिल्हास्तरावर निषेध व्यक्त करतोय. या पलीकडे आम्ही या क्षणी काही करत नाही. कारण जे करायचे आहे ते सरकारने करायचे आहे. फक्त आमची भूमिका इतकीच आहे की, आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादाशी (terrorist) आहे. भाजपच्या संबंधित काही लोक यानिमित्ताने महाराष्ट्रात हिंदू आणि मुसलमानांचा विषय घेऊन कश्मीरच्या विषयाला फोडणी देत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. काश्मीर मधल्या पर्यटकांना तेथील मुस्लिम बांधवांनी जी मदत केलेली आहे, ती विसरता येणार नाही. माझं भारतीय जनता पक्षाला आवाहन आहे की, हे धंदे बंद करा आणि गांभीर्याने हा विषय घ्या. सरकार जर काही दुश्मनांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
या क्षणी इंदिरा गांधींची प्रकर्षाने आठवण
या देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय आहे. पण, नक्कीच आम्हाला या क्षणी इंदिरा गांधींची प्रकर्षाने आठवण येत आहे. इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे 1971 चा प्रसंग हाताळला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि अद्दल घडवली. त्यामुळे आम्हाला इंदिरा गांधींची आठवण नक्कीच येईल. हे सरकार जरी दुबळं असलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देऊ, असेही संजय राऊत यांनी म्हटले.