जम्मू-काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारकडून पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांआधी करण्यात आलेल्या सिंधू जल कराराला मोदी सरकारने स्थगिती दिली तर दुसरीकडे त्यानंतर पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रावर बंदी घातली पण, आता हा निर्णय त्यांच्यावरच उलटला असं दिसत आहे.
दोघांनीही एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक (economy) नुकसान अटळ आहे. पाकिस्तानबद्दल बोलायचे तर भारतीय हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे शेजारच्यांना दररोज 1 कोटी रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज आहे.
भारताकडून पाकिस्तानला आर्थिक धक्का
भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून पाकिस्तानला मोठे आर्थिक (economy) नुकसान सहन करावे लागत असून यामुळे देशाच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असलेल्या ओव्हरफ्लाइट शुल्कावर परिणाम झाला आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, बोईंग 737 सारख्या छोट्या विमानांमुळे पाकिस्तानला दररोज किमान 58,000 डॉलर्सचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. या विमानांचा वापर इंडियन एअरलाइन्स करत ज्यांचे शुल्क सुमारे $580 आहे, जे विमानाचे वजन आणि प्रवास केलेल्या अंतरावर अवलंबून असते.
मोदी सरकारकडून पाकिस्तानची कोंडी सुरूच
पहलगाम हल्ल्याच्या प्रतिसादात भारताच्या कडक ॲक्शननंतर आता भारतीय हवाई हद्द टाळण्यासाठी पाकिस्तान चीनवरून आपली विमाने उड्डाण करत आहे. यामुळे इंधन खर्च आणि कामाच्या अडचणी वाढतील, ज्यामुळे आणखी आर्थिक नुकसान होईल.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स इस्लामाबाद आणि लाहोरहून क्वालालंपूरला दर आठवड्याला सहा उड्डाण करते. आता या विमानांना भारतीय हद्द टाळण्यासाठी चीनच्या हवाई हद्दीतून जावे लागेल परिणामी, प्रवासाचा वेळ खूपच वाढेल. तसेच खराब हवामान आणि कठीण भूप्रदेशामुळे विमानांना तिबेट पठारावरून प्रवास करावा लागत असून या नवीन मार्गाला प्रत्येक प्रवासासाठी अंदाजे तीन तास जास्त लागतील.
पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद व्हायचा भारतीय कंपन्यांवर परिणाम
दुसरीकडे, पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्रही बंद केल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांनाही तोटा सहन करावा लागत आहे. टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने म्हटले की पाकिस्तानचे हवाई क्षेत्र एक वर्ष बंद राहिले तर त्यांना 600 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 5,080 कोटी रुपये) चे नुकसान होऊ शकते. विमान कंपनीने सरकारला ‘सबसिडी मॉडेल’ लागू करण्याची सूचना केली, ज्यामुळे इंधनाचा जास्त खर्च, लांब मार्ग आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते.