‘विकसित भारता’च्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत (Navi Mumbai) आकाराला येत असलेल्या ‘एज्युसिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येत आहेत. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले.
सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. या दोन सामंजस्य करारांनुसार या दोन्ही विद्यापीठांच्या ‘एज्युसिटी’मधील परिसरासाठी प्रत्येकी १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यात इमारतींसोबत इतर सोयीसुविधांचाही समावेश असेल. तसेच या विद्यापीठांच्या भारतातील कॅम्पसमध्ये मूळ कॅम्पसप्रमाणे दर्जेदार सुविधा असतील. आणखी तीन विद्यापीठांसोबतचे करार अंतिम टप्प्यात आहेत. त्याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच आणखी पाच परदेशी विद्यापीठांसोबत प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनीसोबत ३ हजार कोटी रुपयांचा तसेच गोदरेजसोबत दोन हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. ‘प्राईम फोकस’ आणि ‘गोदरेज’ यांच्यासोबत करार उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस’ तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले.‘प्राईम फोकस’सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३ हजार कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २ हजार ५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल. ‘गोदरेज’सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून, याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ६०० रोजगारनिर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, यामध्ये १ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर २ हजार ५०० रोजगार निर्मिती होईल.
‘प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेजकडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य सरकारच् यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहेत. नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरू होत असलेल्या ‘एज्युसिटी’मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी आणि कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे.’