कल्याणपुढील प्रवास सोप्पा होणार; लोकलचा वेगही वाढणार

मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी नव्या रेल्वे (train) मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या बोरिवली ते विरार पाचवी-सहावी मार्गिका आणि कल्याण ते कसारादरम्याम तिसऱ्या मार्गिकाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पुढे सरकणार आहे, या दोन्ही मार्गिकाच्या कामासाठी २९.३२ हेक्टर वनजमिनींवरील झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं लवकरच या मार्गिकाचे काम सुरू होणार असून लवकरच प्रत्यक्ष सेवेत येणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे.

मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील 17 गावांतील 16.54 हेक्टर जमिनीवरील झाडे कापली जाणार आहेत. ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांनी सशर्त काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंत ही परवानगी वैध असेल. वनक्षेत्रात काम करताना नैसर्गिक जलस्रोतांचे प्रवाह बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना वन विभागाने मध्य रेल्वेला केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प अखेर रूळांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी 792 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे.

कल्याण ते कसारादरम्यान नव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे शक्य होणार आहे. 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गिका महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकदा मेल आणि एक्स्प्रेसमुळं लोकल रखडतात. या मार्गिकेमुळं लोकलचा वेग वाढणार आहे.

बोरिवली ते विरार पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम सध्या सुरू असून या प्रकल्पासाठी 2,184 कोटींचा खर्च येणार आहे. या नव्या मार्गिकेनंतर मुंबई सेंट्रल ते विरारपर्यंत सहा मार्गिका उपलब्ध होणार आहेत. तसंच, त्यानंतर मुंबई लोकल आणि मेल एक्स्प्रेसाठी स्वतंत्र्य मार्गिका विरारदरम्यान उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपबल्ध होणार आहेत.