राज्यासह देशभरात हवामानत मोठे बदल होत असल्याचे बघायला मिळतं आहे. अशातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वळवाच्या पावसानं अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजासह सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडवली आहे. किंबहुना पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसासह (Rain Alert) सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर देशभरात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची (Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य परिस्थिती लक्ष्यात घेता सऱ्यांनी सुरक्षेचा अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, संभाव्य चक्रीवादळामुळे 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. (Weather Update) कर्नाटकात मान्सूनपूर्व वादळी सरी कोसळण्याची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. यामुळे जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.
वाशिमच्या कारंजा शहरात वळीवाच्या पावसाने उडवली दाणादाण
वाशिमच्या कारंजा शहरात काल (14 मे) सायंकाळी झालेल्या वळीवाच्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. काही भागात पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी घुसल्याच समोर आलं. काही महिन्यांपूर्वी नविन रस्त्यांचं काम करण्यात आलं होतं. मात्र पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. परिणामी संबंधित ठेकेदार आणि नगरपरिषदेच्या ढिसाळपणामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
राज्यात वळीवाच्या पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका तळकोकणालाही बसला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडीत जोरदार वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजाला आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.