अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला येणाऱ्या भाविक वारकऱ्यांकडून तुळशीचे हार तसेच फुलांचे हार विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करतात मात्र समितीकडून हे हार कचरा डेपोमध्ये जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्या व भक्तांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये यासाठी मंदिर समितीने तातडीने विठ्ठल रुक्मिणी चरणी येणारे हार पुष्प व तुळशी हार सध्या भाविकांनाच पुन्हा घातले जात असून याच तुळशीहार व फुलांच्या हारा पासून अगरबत्ती बनवण्यासाठी उपयोग करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने यापूर्वीच घेतला असून, यासाठी प्रभव आरोमॅटिक्स, पंढरपूर यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यांचेकडून श्रींच्या निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, भाविकांना आषाढी यात्रा २०२५ पूर्वी धुप व अगरबत्ती उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिरात येणारे भाविक भक्तीभावाने श्रींस तुळशी, हार व फुले अर्पण करीत असतात. अर्पण केलेल्या हार-फुलांपासून धुप व अगरबत्ती तयार करण्यासाठी यापूर्वी थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. तथापि, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड, प्रभव आरोमॅटिक्स यांना सदरचे काम देण्यात आले आहे. त्यांचेकडून तीन ते चार प्रकारच्या अगरबत्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत.
त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री संत तुकाराम भवन येथे लवकरच स्टॉलद्वारे अल्प देणगी मुल्य आकारून भाविकांना धुप व अगरबत्ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्याची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे. सदर निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती उत्पादनास प्रत्यक्ष सुरवात होऊन भाविकांना उपलब्ध होईपर्यंत श्रींच्या गाभाऱ्यात जमा होणारी हार-फुले दर्शनरांगेतील भाविकांना देण्यात येत आहेत. भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही याची दक्षता मंदिर समितीने घेतली असल्याचे यावेळी मनोज श्रोत्री यांनी सांगितले.