आष्टा शहरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी

आष्टा, शहरातील गाव कामगार चावडी कार्यालयातील दप्तर इस्लामपूर येथील रेकॉर्डमध्ये जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आष्टा शहरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे, ही गैरसोय थांबवावी अन्यथा विविध सामाजिक संस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विश्वराज शिंदे युथ फाऊंडेशन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

आष्टा तहसील कार्यालयात विश्वराज शिंदे यांनी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी सुहास रुगे, अनिल शिंदे, सैफ इनामदार, रियाज म्हेतर, दत्तराज हिप्परकर, शिवराज शिंदे, विश्वजीत कोळेकर, शिवराज पाटील, सम्मेद पाटील, प्रतीक टिंगारे, विशाल कोळेकर, ऋषिकेश जबगोंडे, तेजस पन्हाळकर, ओंकार गडदे, प्रथमेश वारे, गणेश ठोमके, शंतनू जाधव, शुभम शिंदे व विश्वराज युथ फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वराज शिंदे म्हणाले, आष्टा गाव कामगार तलाठी कार्यालयातील दप्तर इस्लामपूर येथील रेकॉर्ड रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे यापुढील काळात शेतकरी बांधवांना उतारे काढताना इस्लामपूरला हेलपाटे करावे लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आष्टा शहर आणि परिसरातील शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान तर होणार आहेच शिवाय वेळही वाया जाणार आहे. त्यामुळे शासनाने आष्टा शहरातील दप्तर आष्टा शहरातच ठेवण्याची व्यवस्था करावी अन्यथा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही शेवटी त्यांनी दिला.