बांधकाम कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्यात               

इचलकरंजी, बांधकाम कामगारांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी इचलकरंजी व परिसरातील विविध कामगार संघटना व कार्यकर्ते यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम कामगारांची नवी नोंदणी संपल्यानंतर त्यास नुतनीकरण करावे लागते. नुतनीकरणाचा अर्ज भरल्यानंतर तो मंजूर होण्यास २ ते ४ महिन्याचा कालावधी लागतो. पूर्वी नुतनीकरण मंजूर झाल्यानंतर त्याचा मागील कालावधी संपलेल्या तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून त्याची नोंदणी जिवीत होत होती. परंतु सध्याच्या नियमाप्रमाणे नुतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेल्या तारखेपासून पुढील एक वर्षाकरिता त्याची नोंदणी जिवीत होते. तरी नुतनीकरणाकरिता जुन्या पध्दतीचा वापर करावा व नुतनीकरणाची पावती त्याप्रमाणे कामगारांना मिळावी. बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणीचे अर्ज भरताना कामगाराच्या किंवा कुटुंबियांच्या नाव आधार क्रमांकामध्ये किरकोळ चुका झालेल्या आहेत. असे अर्ज नोंदणी अधिकाऱ्यांनी नामंजूर न करता मंजूर केले आहेत. परंतु मंजूर झालेल्या कामगारांना कोणताही लाभ दिला जात नाही. तरी सदर बाबत दुरुस्तीचे कामकाज चालू करावे.

शैक्षणिक लाभ योजना ई-०५ मध्ये अभियांत्रिकी पदवीचा लाभ मिळणेकरीता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ठराविक कोर्सची यादी तयार केली आहे. सदर यादी व्यतिरिक्त कोर्स असेल तर त्यास ई-०५ चा लाभ मिळत नाही. अभियांत्रिकी पदवीमध्ये नवीन भरपूर कोर्स आलेले आहेत. तरी सदरचा लाभ सरसकट सर्व कोर्सना मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर प्रमोद पवार, मदन मुरगूडे, राजेंद्र निकम, कॉ. आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, सुनिल बारवाडे, दिपक रेपाळ, रजनीकांत माने आदिंच्या सह्या आहेत.