येथील राजराजेश्वरीनगरमध्ये घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप उचकटून तिजोरीत ठेवलेली दिड लाखाची रोकड आणि तीन लाखाचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा ४.५५ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी घरमालक शामराव गणपती घारसे (वय ६२) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजराजेश्वरीनगरमधील ओम चौकात राहणारे शामराव घारसे यांच्या पत्नीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे चार दिवसांपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांपासून घारसे हे घरात एकटेच राहण्यास होते. गुरुवारी रात्री त्यांची रात्रपाळी असल्याने घर कुलूपबंद करुन ते कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी ते घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता तिजोरीतील दीड लाखाची रोकड आणि सोन्याचे दिड तोळ्याचे मिनी गंठण, अर्धा तोळ्याच्या रिंगा, अर्धा तोळ्याची अंगठी, टॉप्स १ जोड, सोन्याचे १५ मणी आणि नाकातील नथ असे साडेतीन तोळ्याचे दागिने मिळून ४ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी जिन्याचे कुलूप उचकटून तेथून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनेत वाढ होत असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.