पुढील काही वर्षांमध्ये आर्टिफिशिल इंटेलनिजन्स म्हणजेच AI मोठी क्रांती घडवेल आणि याचा फटका नोकऱ्यांना बसेल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत असतात. याचा प्रत्यय आता अनेक क्षेत्रांमध्ये येताना दिसूही लागला आहे. बँकेने एआयमुळे 25 वर्षांपासून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलं. न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे, महिला कर्मचाऱ्यानेच एआयला प्रशिक्षण देण्यात मदत केली होती. पण हाच एआय आपली नोकरी हिरावून घेईल याची तिला थोडीही कल्पना नव्हती.
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या बँकेत मागील 25 वर्षांपासून काम करणाऱ्या एका महिलेने खुलासा केला आहे की, तिने अनावधानाने अशा एआय प्रणालीला प्रशिक्षित करण्यास मदत केली, ज्याने तिची जागा घेतली. कॅथरीन सुलिव्हन यांना जुलैमध्ये कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया (सीबीए) मधून इतर 44 कर्मचाऱ्यांसह काढून टाकण्यात आले. बँकेने एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नोकरकपात करण्याचा हा पहिलाच प्रकार होता.
कॅनबेरा येथे झालेल्या एआय सेम्पोजियममध्ये बोलताना सुलिव्हन यांनी सांगितले की, बँकेच्या एआय चॅटबॉट, बंबलबीसाठी स्क्रिप्ट तयार करण्यात आणि प्रतिसादांची चाचणी करण्यात त्यांची भूमिका त्यांना नोकरी गमावण्यास कारणीभूत ठरेल याची त्यांना कल्पना नव्हती.
त्यांच्या या अनुभवनाने पारंपारिक नोकऱ्यांवर एआयचा वाढता प्रभाव अधोरेखित होत आहे आणि तंत्रज्ञान कामाच्या ठिकाणी कसे बदल करत आहे याबद्दल चिंता निर्माण करत आहे. “आम्हाला माहित होतं की मेसेजिंग अखेरीस परदेशात पाठवलं जाईल. परंतु कंपनीत 25 वर्षं काम केल्यानंतर मला अशाप्रकारे काढलं जाईल अशी मी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती,” असं तिने न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाला सांगितले.
अनवधानाने, मी एका चॅटबॉटला प्रशिक्षण देत होते ज्याने माझे काम हिरावून घेतले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 63 वर्षीय सुलीवन यांना बॉटचे रोल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कामावर पाठवलं जाईल अशी अपेक्षा होती परंतु त्याऐवजी त्यांना आता तुमची गरज नाही असं सांगण्यात आलं.
आता आपली गरज नसून, अनावश्यक झालो आहोत हे जाणून घेणं आपल्यासाठी फार धक्कादायक होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. “मी एआयचा वापर व्हावा आणि ते स्विकारावं या मताची आहे. आणि कामाच्या ठिकाणी आणि बाहेरही मला त्याचा उद्देश दिसतो. परंतु कॉपीराइट (उल्लंघन) रोखण्यासाठी किंवा माणसांची जागा घेण्यासाठी काही प्रकारचे नियमन आवश्यक आहे असे मला वाटते,” असं मतही त्यांनी मांडलं आहे.
