‘प्राध्यापक भरती’साठी राज्यातील प्राध्यापकांचे उच्च शिक्षण संचलनालयासमोर आंदोलन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील अकृषक महाविद्यालयातील ५ हजार १२ पदांच्या प्राध्यापक भरतीस मान्यता दिलेली आहे . त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही एक ते दीड महिन्यांमध्ये प्राध्यापक भरती सुरू केली जाईल असे सांगितले होते. दोन महिने उलटले तरी अद्यापही भरतीचा अध्यादेश निघालेला नसल्याने नेट-सेट, पी.एचडी. धारक संघर्ष समिती बुधवार १० सप्टेंबर २०२५ पासून उच्च शिक्षण संचलनालय, पुणे येथे आंदोलन करणार आहे.

राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु अपुऱ्या मनुष्यबळा अभावी NEP २०२० राबविणे कठीण बनले आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच राज्यात २०१२ पासून प्राध्यापक भरती अनियमित व बंद असल्यामुळे अनेक सी.एच.बी. प्राध्यापक १५ ते २० वर्षापासून अल्प वेतनावर अध्यापनाचे काम करीत आहे. आज ना उद्या भरती होईल ह्या भोळ्या आशेवर ते जीवन जगत आहेत. तर गेल्या दोन वर्षापासून ताण तणावातून अनेक सी.एच. बी. प्राध्यापकानी आत्महत्या केल्या आहेत. तर काहींना हार्ट अटॅक मुळे जीव गमवावे लागले आहेत, असल्याचे मत संघर्ष समितीने मांडले आहे.

जोपर्यंत प्रत्यक्ष शासन निर्णय निघत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत समिती शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयात प्राध्यापकच नसतील तर त्याची अंमलबजावणी कशी करणार आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व सशक्त पिढी घडविण्यासाठी प्राध्यापकाची आवश्यकता आहे, असे मत नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीने व्यक्त केले आहे.

नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने प्राध्यापक भरतीचा ५ हजार १२ पदांचा भरतीचा शासन निर्णय (GR) निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‌बुधवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संचालक उच्च शिक्षण यांचे कार्यालय पुणे येथे ही आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास कालंतराने आझाद मैदान मुंबई येथे देखील तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.