सूर्यकुमार यादवने एका उत्तरात संपवला विषय; म्हणाला ‘त्यांच्यापेक्षा चांगलं क्रिकेट…’

आशिया कपमधील सुपर 4 स्टेजमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने सहा गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात एकेकाळी भारत-पाकिस्तानला कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं जायचं. पण आता दोन्ही संघांचा एकमेकांविरोधातील रेकॉर्ड पाहता तसं म्हणू शकत नाही. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने हे विधान केलं आहे. दोन्ही देशांना आता कट्टर प्रतिस्पर्धी म्हणू शकत नाही असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. आशिया कपमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात भारताने आपला संघ पाकिस्तानपेक्षा वरचढ असल्याचं सिद्ध केलं आहे. भारतीय फलंदाजांसमोर पाकिस्तानी गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकल्याचं चित्र होतं.

भारताने टी-२० मध्ये पाकिस्तानवरील आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आशिया कपमधील एकमेकांविरोधात सामन्यातील रेकॉर्ड 12.3 अशा फरकाने भारताच्या बाजूने आहे. हे दोन्ही संघांमधील गुणवत्तेतील दरी स्पष्टपणे दर्शवते.

पाकिस्तानविरोधातील विजयानंतर सूर्यकुमार यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचा दावा फेटाळून लावला. भारताने एकतर्फी वर्चस्व राखलं असून, आता या स्पर्धेकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहू शकत नाही असं त्याने म्हटलं आहे. तसंच संघाच्या अष्टपैलू कामगिरीला सर्व श्रेय दिलं आहे.

“तुम्ही भारत-पाकिस्तानमधील कट्टर प्रतिस्पर्धीबद्दल प्रश्न विचारणे थांबवावे. माझ्या मते, जर दोन्ही संघ 15-20 सामने खेळत असतील आणि त्यांचा रेकॉर्ड 7-7 किंवा 8-7 असेल तर त्याला प्रतिस्पर्धी म्हणतात. 10-0, 10-1, मला आकडेवारी माहित नाही, पण आता ही प्रतिस्पर्धीची स्थिती नाही. मला वाटतं की आम्ही त्यांच्यापेक्षा (पाकिस्तान) चांगले क्रिकेट खेळलो आणि गोलंदाजीच्या दृष्टिकोनातूनही,” असं सूर्यकुमार यादवने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

2022 मध्ये झालेल्या आयसीसी टी 20 विश्वचषकापासून, भारताने टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व राखलं आहे. भारताने सलग सात विजय मिळवले आहेत. ही मालिका सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे सातत्य आणि वर्चस्व अधोरेखित करते. त्यांची फलंदाजीची खोली आणि शिस्तबद्ध गोलंदाजी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसाठी वारंवार खूपच मजबूत असल्याचे सिद्ध होते.

दरम्यान, रविवारी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली गती मिळवली होती. त्यांनी 10 षटकांत 91 धावा केल्या, ज्यामध्ये भारताने काही महत्त्वाचे झेल सोडले. तथापि, गोलंदाजांनी दुसऱ्या टप्प्यात परिस्थिती पूर्ववत केली, त्यांना 171 पर्यंत रोखले.