रणजी ट्रॉफी 2025-26 चा सीजन सुरु होण्याआधी महाराष्ट्र आणि मुंबईच्या संघात सराव सामना झाला. हा सराव सामना पृथ्वी शॉ च्या वादामुळे जास्त चर्चेत आहे. महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मुंबईचा ऑलराऊंडर मुशीर खान यांच्यात भर मैदानात राडा झाला. पृथ्वी शॉ ने आपली नवीन टीम महाराष्ट्राला स्वत:ची फलंदाजीची क्षमता दाखवून दिली. आपल्याच पूर्व संघाविरुद्ध म्हणजे मुंबई विरुद्ध सामन्यात पृथ्वी शॉ ने शतकी खेळी केली. 25 वर्षीय पृथ्वी शॉ ने 140 चेंडूत दमदार शतक झळकावलं. अर्शीन कुलकर्णी सोबत 305 धावांची ओपनिंग भागीदारी केली. पृथ्वी शॉ 181 धावांवर आऊट झाला. त्यानंतर मैदानाबाहेर जाताना आपल्या जुन्या माजी सहकाऱ्याशी त्याची वादावादी झाली.
मुशीर खानच्या गोलंदाजीवर डीप फाइन लेगला स्लॉग स्वीपचा फटका खेळताना पृथ्वी शॉ कॅचआऊट झाला. पृथ्वी मैदानाबाहेर जात असताना मुशीर बरोबर त्याची वादावादी झाली. यावेळी प्रकरण शांत करण्यासाठी अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना धावफलकावर महाराष्ट्राच्या 3 बाद 430 धावा आहेत.
क्रिकबजच्या वृत्तानुसार पृथ्वी शॉ इतका चिडला कारण मुशीर खानने स्लेजिंग केलं. पृथ्वी बाद झाल्यानंतर मुशीर थँक्यू म्हणाला. त्यामुळे पृथ्वी चिडला. त्याने मुशीरची कॉलर पकडून बॅट उगारण्याचा प्रयत्न केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. “ही प्रॅक्टिस मॅच होती. ते माजी संघ सहकारी आहेत. अशा गोष्टी घडतात. आता सर्व ओके आहे. काही मुद्दा नाही” असं महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावने म्हणाला. पृथ्वी शॉ ने मुंबईची साथ सोडून महाराष्ट्राची टीम जॉइंन केली आहे. बुची बाबू टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना पृथ्वीने छत्तीसगड विरुद्ध 111 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉ सध्या महाराष्ट्राकडून खेळताना मैदानात धावांचा पाऊस पाडतोय.
पृथ्वी शॉ प्रतिभावान खेळाडू आहे. मुंबईच्या शालेय स्तरावरील क्रिकेटपासून तो चर्चेत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप सुद्धा जिंकला आहे. तो आणि शुबमन गिल वर्ल्ड कपमध्ये एकत्र खेळले होते. पृथ्वीची बॅट आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण आज पृथ्वी शॉ वादांमध्ये अडकला आहे. पृथ्वीचा वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी मैदानाबाहेरील प्रकरणामुळे तो चर्चेत होता.
