राज ठाकरेंना महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान

महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष होण्याबाबत एक प्रकारे विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात होते. त्यामुळं राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अशात आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते राज ठाकरेंबाबत दिल्लीला प्रस्ताव पाठवतील आणि हायकमांडकडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत निर्णय घेतील, असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर आता निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावरचं आता गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात आलं तेव्हापासूनचं निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपचं कार्यालय झालं असून तिथूनच भाजपचं कामकाज चालते. निवडणूक आयोग भाजपचा बाहूला बनला असून लोकशाहीचा खून त्यांनी केल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

निवडणूक आयोगच संशयास्पद आहेत. सातत्याने चुका करायच्या लोकांनी त्यात ऑब्जेक्शन घेतलं की त्यात सुधारणा करायच्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे जे बूथ होते, विधानसभेच्या बूथ प्रमाणेच या सगळ्या याद्या तयार व्हायच्या. यांनी आता जे मतदान केंद्र आहे, ते आता बदलविले आहेत. मतदारांची नावे दुसऱ्या भागात नेऊन टाकल्याचा घोळ केला आहे. निवडणूक आयोग एक प्रकारे भाजपचा बाहुला म्हणून काम करीत असून ते लोकशाहीचा खून करीत आहे. चुका करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्या दुरुस्त करायला पाहिजे, निवडणुका या पारदर्शक झाल्या पाहिजे. घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली. मोदींचा सरकार देशात आलं तेव्हापासून या निवडणूक आयोगाचं कार्यालय हे भाजपचं कार्यालय झालं आहे, तिथून आता भाजपचं काम चालतंय आता जे काही चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात, त्यात आता ती किती सुधारणा करतात. कारण आता यात वेळ चालला गेलेला आहे. याद्या तयार करण्यासाठी वेळ वाढवून दिला पाहिजेत, याद्या करेक्ट झाल्या पाहिजे. नंतरच निवडणूक लावल्या पाहिजे ही आमची मागणी आहे. असेही नाना पटोले म्हणालेत.