कॅबिनेट बैठकीत सरकारचे 7 महत्त्वाचे निर्णय

राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आज सात महत्त्वाच्या विभागांसंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अगदी विकसित महाराष्ट्र-2047 पासून ते अगदी 1 रुपये भाडेतत्वावर जमीन देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. गृह विभाग, सामान्य प्रशासन विभागाबरोबरच ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे हे निर्णय काय आहेत ते पाहूयात…

गृह विभाग
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्य शासनाच्या 50 टक्के हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभाग
सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार. सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणुक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) (Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach) अशा पदनाम विस्तारास मान्यता. याशिवाय परकीय थेट गुंतवणूक (FDI), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) आणि परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs) अशा तीन नवीन कार्यासनांच्या निर्मितीस आणि या कार्यासनांसाठी आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

नगरविकास विभाग
महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभाग
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश 2025 काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विधि न्याय विभाग
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय होणार. या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

नियोजन विभाग
विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील 16 संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत 100 उपक्रम निश्चित झाले आहेत.

महसूल विभाग
वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा येथील 29.85 हे. आर जमीन. या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील 30 वर्षाकरिता नुतनीकरणास मान्यता दिली आहे.