कोल्हापूरात सुमारे साडेएकतीस तोळे सोने आणि सव्वा लाखांची रोकड लंपास

कसबाबावडा येथील आंबेडकरनगर येथील पिंजार गल्लीतील पाटील मळ्यात हा प्रकार सोमवारी घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अजित पाटील सधन शेतकरी आहेत. त्यांचा महिन्यापूर्वीच विवाह झाला.

ते आई, पत्नी आणि बहिणीसह शनिवारी (ता. ३०) देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घरी असलेल्या म्हशींच्या धारा काढण्यासाठी त्यांचा मामेभाऊ अक्षय लोकरे तेथे दररोज सकाळ-संध्याकाळ येत होते. सोमवारी सकाळी ते आल्यानंतर घरी बसले होते. त्यांना काही साहित्य पाहिजे असल्यामुळे ते बेडरुममध्ये गेले. तेथे तिजोरीतील साहित्य विस्कटलेले दिसले.

त्यानंतर ते अजितच्या बहिणीच्या बेडरुममध्ये गेले. तेथेही कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अजित यांचे चुलतभाऊ अभिजित पाटील यांना बोलावले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने येत पंचनामा केला; तेव्हा सुमारे साडेअठरा लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती पुढे आली. घटनास्थळी तातडीने श्वानपथक, ठसे तज्‍ज्ञही बोलविण्यात आले होते.

माहीतगाराचे कृत्य

कडीकोयंडा किंवा कुलूप तोडूनही चोरी झालेली नाही. त्यामुळे चोरी माहीतगारानेच केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. फिर्यादी अजित यांचे भाऊ अक्षय म्हशींच्या धारा काढण्यासाठी गेल्यानंतर चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केल्याचा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला. पत्नीचे आणि बहिणीच्या विवाहासाठी ठेवलेले सर्वच दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत.

फक्त दागिन्यांवरच डल्ला

दोन्ही बेडरुममध्ये केवळ दोन कपाटांमधील फक्त दागिनेच चोरीस गेले आहेत. अजित यांची बहीण संगणक अभियंता आहे. त्यांच्याकडे दोन लॅपटॉप आहेत. ते आणि त्यांचे मोबाईल हॅण्डसेट तेथेच होते. चोरट्याने त्याला हातही लावला नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.