मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी त्यांनी केली आहे.आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला राज्यातील मराठा समाजाने पाठींबा दिला असून बुधवारी (१४ फेब्रुवारी) अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे. जालना, बीड लातूर, परभणी, धाराशिव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पहाटेपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
बीडमध्ये देखील बुधवारी पहाटेपासून कडकडीत बंद पाळला जात असून पोलिसांनी कलम १४४ लागू केलं आहे. जालना जिल्ह्यातील हसनाबाद तालुक्यात काही व्यापारी संघटनांनी बंद पाळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीसा धाडल्या आहेत.
