इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

महाराष्ट्रात सर्वाधिक यंत्रमाग आहेत. देशातील एकूण वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा मोठा आणि महत्वाचा वाटा आहे. राज्य शासनाने अडचणीतील वस्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली. या समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, सुभाष देशमुख, रईस शेख, अनिल बाबर, प्रविण दटके यांचा समावेश असून या समितीने वस्त्रोद्योगातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना सुचविणारा अहवाल शासनाला तयार केला.

विविध अडचणीतून वस्त्रोद्योगाला नवसंजिवनी मिळावी यासाठी यंत्रमाग उद्योगातील प्रश्नांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी नियुक्त केलेल्या अभ्यास समितीने तयार केलेला अहवाल समितीचे अध्यक्ष दादाजी भुसे व आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रईस शेख उपस्थित होते. या अहवालात अनेक महत्वाच्या उपाययोजना सूचविण्यात आल्या असून त्याला शासन निश्चितपणे मंजुरी देईल आणि यंत्रमाग उद्योगास पुन्हा उभारी मिळेल अशी आशा आहे.