हातकणंगलेतून महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेना!

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, तरी महायुतीतील जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा घोळ मात्र संपता संपेना. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या महायुतीच्या २८ जागांचा अजून निर्णयच न झाल्याने या जागांवरील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.दरम्यान, महाविकास आघाडीने थेट उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नसली, तरी कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. दुसरीकडे महिनाभर अगोदर उमेदवारांची घोषणा करण्याची परंपरा असलेल्या भाजप आणि महायुतीचे मात्र घोडे अडले आहे.

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा निर्णय होईल, अशी अपेक्षा असताना ती लांबली आहे.

जिल्ह्यातील दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जातील, असे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप व शिंदे गटाचे प्रमुख नेतेही सांगत असताना निर्णय मात्र अद्याप होत नाही.एकीकडे निर्णय लांबत असताना इच्छुकांनी मात्र आपल्या संभाव्य उमेदवारांविरोधात टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. ही टीका करत असताना थेट उमेदवारांवर न करता या घडामोडीत आघाडीवर असलेल्या नेत्यांवर करून आपल्या परिपक्वतेचे दर्शन दिले जात आहे.