आठवीतील विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करून खून

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत शालेय विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.प्रकाश हरिसिंग रजपूत (वय 15, रा. आनंदवन सोसायटी, मणेरवाडी), असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकत होता. प्रकाश हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी शाळेत त्याचे इतर विद्यार्थ्यांबरोबर भांडण झाले होते. साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला होता.

त्याचे आई-वडील कामावर गेले होते, तर भाऊ दहावीच्या परीक्षेला गेला होता. मणेरवाडी हद्दीतील डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात प्रकाश हा झोपेत असताना हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला.

मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला. हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, अंमलदार संतोष तोडकर, संतोष भापकर आदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश हा स्वभावाने शांत होता. तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करून आई-वडिलांना हातभार लावत होता. वर्गातही तो हुशार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि हल्लेखोर तरुण (२ अल्पवयीन) यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.