तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून मेंढपाळ कुटुंबीयांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी मागणी केली.खंडनाळ (ता. जत) येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामू कुलाळ (वय ४५) यांचा शेळ्या-मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजीबा थोरात यांच्या शेततळ्यात पडून मृत्यू झाला होता.
या घटनेकडे कोणीही लक्ष न दिल्याने तम्मनगौडा रवीपाटील यांनी थेट गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला. शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मेंढपाळाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.