इचलकरंजीत वाहतूक कोंडी! नागरिकांचा जीव धोक्यात….

इचलकरंजी शहरात अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. शहरात खूपच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अपघाताला तोंड फुटते.वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने दर्शन घडवणारा एएससी कॉलेज चौक आता मृत्यूचा सापळा बनू लागला आहे.चौकात अतिक्रमण हाच कळीचा मुद्दा आहे.शनिवारी (ता.२०) एकाचा बळी गेल्याने चौक पुन्हा चर्चेत आला आहे.

त्यामुळे अजून किती जणांचे जीव घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.इचलकरंजीतून कोल्हापूर महामार्गावर जाण्यासाठी तसेच हातकणंगले तालुक्यातील गावांना जोडणारा एएससी कॉलेज चौक हाच मुख्य मार्ग आहे. त्यामुळे चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. पुजारी मळा, चंदूर रोड, भोने माळ, जवाहरनगर, कबनूर आदी भागांतील रस्ते एएससी कॉलेज चौकात येऊन मिळतात. त्यामुळे सर्वच बाजूने वाहतुकीचा ओघ असतो.

प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो.त्यातच शाहू पुतळा आणि कोल्हापूर रोडपासून एएससी कॉलेज मुख्य चौकापर्यंत रस्त्यालगतचा बराचसा भाग अतिक्रमणांनी व्यापलेला आहे. त्यामुळे चौकातील रस्ता अधिकच अरुंद बनला आहे. चौकातील बसथांब्यावर दिवसभर नोकरदार, विद्यार्थी, रिक्षाचालकांची वर्दळ असते.

या रस्त्यालगतच वाहनेही उभी केली जातात. त्यामुळे अरुंद रस्ता अधिकच अरुंद होऊन अपघातांना निमंत्रण मिळते.तसेच स्पीडब्रेकर, वाहतूक नियंत्रक दिवे, झेब्रा क्रॉसिंग, फलक यांचाही पूर्ण अभाव आहे. या बाबींची पूर्तता केली असती तरी अपघात तसेच जीव गमवावा लागला नसता.