इचलकरंजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य…

अलीकडच्या काही दिवसापासून इचलकरंजीत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. इचलकरंजी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या कचऱ्याचा वेळेत उठाव होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. शहरातील विविध भागांत पुन्हा कचऱ्यांचे ढीग आढळून येत आहेत. महापालिकेकडे कचरा उठाव करणारी यंत्रणा असतानाही ती कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.

एकेकाळी कचरा कोंडाळामुक्त इचलकरंजी असा मान मिळवलेल्या या शहराची वाटचाल पुन्हा स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडे होत चालली आहे. स्वच्छतेसारख्या अतिसंवेदनशील प्रश्‍नावर महापालिकेची आरोग्य यंत्रणेची ढिलाई दुर्लक्ष करण्यासारखी नाही. एकीकडे महापालिकेचे प्रशासकीय कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असताना शहरात मात्र अस्वच्छतेमुळे अवकळा पसरत चालली आहे.घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यास सुरुवात केल्यानंतर उघड्यावर पडणारा कचरा थांबला. त्यामुळे ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग गायब झाले.

नागरिकांनाही घंटागाडीतच कचरा टाकण्याची सवय लागली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या मानांकनात इचलकरंजी महापालिकेने वेळोवेळी चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण अलीकडील काही दिवसांत शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शहरातील सर्वच भागात असे चित्र आहे. कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेने खासगी यंत्रणा नियुक्त केली आहे. पण त्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

वर्दळीच्या मार्गावरच कचरा साचत आहे. त्यामध्येच भटकी जनावरे फिरत असतात. त्यामुळे विदारक चित्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम शहरातील सार्वजनिक आरोग्यावर होण्याची भीती आहे. सध्या वळीव पावसाचे दिवस आहेत. या पावसात साचलेला कचरा भिजल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे.त्याहीपेक्षा सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा वेळेत उठाव करण्यासाठी महापालिकेची ठोस यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.