विधानसभेला नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी…..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे २५ वा वर्धापन दिन सोहळा अहमदनगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. गेल्या २५ वर्षांत आपल्या पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला. शरद पवार या ब्रॅण्डने आपल्याला तब्बल साडे सतरा वर्षे सत्ता दिली. अनेकांनी ही सत्ता उपभोगली. अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलं.पण त्यांच्यावर कानाकोपऱ्यात प्रेम करणारे लोक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल आले.

पण या निवडणुकीत कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आणल्या. महाराष्ट्रभर शरद पवार यांची लाट आपण पाहिली. त्यांना बारामतीत अडकले पाहिजे ही दिल्लीश्वरांची इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही. ते म्हणाले, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. अनेकांनी माझे महिने मोजले, पण काळजी करू नका. मी काही मोदी, भाजपसारखी ४०० पार करण्याची घोषणा करण्याची चूक करणार नाही. अंदाज न लागू देता विधानसभेचा निकाल लावणार.

महाराष्ट्रात नव्या चेहऱ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आठ खासदार निवडून येणे हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चुक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका, असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.