लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर महाविकासआघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केलं. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगलं काम केलं. महाराष्ट्रात जनजागरण केलं. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिलं, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं आहे.’
