उजनीत जलपर्यटन, ९१ धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.या कामांच्या सर्वेक्षणास गुरुवारपासून (ता. २०) सुरवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा ३० जुलैला तयार करून प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण १५ ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यात प्रकल्पाला राज्य शिखर समितीची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. आराखड्यास तत्काळ उपमुख्यमंत्री यांनी तत्वत: मान्यता देऊन १५० ते २०० कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे. सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल, कृषी आणि ग्रामीण पर्यटन यांचे अनोखे मिश्रण आहे.उजनी धरण हा या पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे १५० ते २०० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडवून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॉविलियन निर्माण होऊ शकते.
माहिती, तिकीट केंद्र व प्रतीक्षलाय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, एक हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाइट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाइंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रूझ सफारी, ॲक्वेटिक लाइफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला, मासेमारीसह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.