लग्नाला नकार दिल्याने चाकूने वार करत वाळव्याच्या तरुणीचा खून

लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करत तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना म्हाळुंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठलाग करून आरोपी तरुणाला कराड (जि.सातारा) येथे बेड्या ठोकल्या.प्राची विजय माने (वय 21, रा. आंबेठाण, खेड, मूळ – इस्लामपूर, वाळवा) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, अविराज रामचंद्र खरात (रा. बहे, ता. वाळवा) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाईलही सोबत घेऊन तो पसार झाला होता.तो दुचाकीवरून सातारा-कराड रोडवरून जात असल्याची माहिती रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच तो जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईलसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.