तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज

नवरात्रोत्सव व दिवाळीचा सण तोंडावर असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.तेलाचे भाव किलो मागे तब्बल २० ते २५ रुपयांनी वाढले आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणी महागली असून, सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० रुपयांनी वाढ केली आहे.सोबत दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ झालेली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे, तर खाद्यतेलात अचानक किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

आगामी काळात नवरात्रोत्सव व दिवाळीमुळे तेलाचा वापर वाढणार आहे. अशात खाद्यतेलाचे भाव किलोमागे २० से २५ रुपयांनी वाढल्याने घरा-घरांत फोडणीचा ठसका उडणार आहे.तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात २२ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा करताच व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाच्या किमती वाढवल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. सूर्यफूल, सोयाबीन व पाम तेलाच्या किमती १५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढल्या आहेत. सूर्यफूल जुना दर १,७५० रुपयांचा डब्याचा होता, आताचे दर २,१०० रुपये, सोयाबीन डब्याचा जुना दर १,६०० रुपये व आताचे दर २००० रुपये, पाम तेल जुना दर १,६०० व आताचे १,८०० रुपये दर आहेत.