इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपने केलेली पक्ष बांधणी आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे मनोमिलन यशस्वी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राहुल आवडे यांची वाट सोपी झाली आहे.मात्र महायुतीमध्ये झालेली बंडखोरी आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे मदन कारंडे भाजप समोर आव्हान बनले आहे. रिंगणात 13 उमेदवार असले तरी भाजपचे राहुल आवाडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांच्यातच प्रमुख लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये शेवटाच्या टप्प्यात बंडखोरी रोखण्यात यश आले. पण महायुतीमध्ये बंडखोरी रोखण्यात भाजपसह महायुतीच्या नेत्यांना अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी कायम राहिली आहे.
मात्र कारंडे आणि आवाडे यांच्या लढतीत त्यांच्या निभाव लागणार का? हे निकालानंतर स्पष्ट होईल.तर दुसरीकडे मदन कारंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभा राहिल्याने त्यांचे मताधिक्य रोखण्यासाठी चोपडे यांची बंडखोरी असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी लढतींमध्ये आमदार प्रकाश आवाडे व भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात राजकीय संघर्ष राहिला. मात्र आमदार आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर रिंगणात नसल्याने जिल्हा परिषदेचा अनुभव असलेले राहुल आवाडे प्रथमच विधानसभा रिंगणात उतरले आहेत. मागील विधानसभेत आवाडे यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करत अपक्ष निवडणूक लढवत असताना त्यांना 50 हजारांचे मताधिक्य मिळाले होत. आता त्याला भाजपच्या पक्ष बांधणीचाही फायदा होणार आहे. भाजपचे दुसऱ्या फळीतील एक-दोन नेते आवाडे यांच्या विरोधात गेले तरी सध्या पक्षीय पातळीवर आवाडे यांच्या प्रचाराचा जोर आहे.
कारंडे यांची तुलनेने ताकद कमी असली तरी सध्या त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची मदत त्यांना उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मतदारापर्यंत थेट संपर्क असल्याने त्याचा फायदा कारंडे यांना होऊ शकतो.या शिवाय विठ्ठल चोपडे यांना मानणारा विशिष्ट वर्ग आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. त्यामुळे त्यांना मिळणारी मते लक्षवेधी असू शकतात. मनसेचे उमेदवार रवी गोंदकर यांची उमेदवारीही चर्चेत आहे. मात्र गोंदकर आणि चोपडे यांच्या मतदानाचा फटका महाविकास आघाडीला बसण्याचा अंदाज आहे.
