खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे महायुतीतील उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आटपाडी येथे भव्य प्रचारसभा झाली. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी अपप्रचार केला. न्यायालयात जाऊन योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीनंतर देखील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. ज्यांनी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुम्ही जोडा दाखवा असा खोचक सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मनी आणि मसल पॉवरच्या बळावर राजकारण होत असलेल्या भागात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडून ते सोडवणारा असामान्य नेता या भागात जन्माला आला, त्याचे नाव म्हणजे स्व. अनिल बाबर. शिवसेनेमध्ये आम्ही जो उठाव केला तेव्हा ते खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत उभे राहिले. त्यांची एकच मागणी होती काहीही करून टेंभू जलसिंचन योजना पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम केलें. स्वर्गीय अनिल बाबर यांच्या पश्चात गेल्या आठ महिन्यात साडेतेराशे कोटी रुपयांचा विकासनिधी या मतदारसंघाला दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मृत्यू झालेल्या व्यक्तीवर टीका करण्याची संधी देखील काहींनी सोडली नाही. त्यांची माणुसकी मेलेली आहे. मात्र सुहास बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी या एकनाथ शिंदेंनी स्वीकारली असल्याचे जाहीर केले. या भागात एमआयडीसी देऊ, मोठे कारखाने आणू याची जबाबदारी मी स्वतः घेतो.
स्वर्गीय अनिल बाबर यांनी केलेली मेहनत, त्यांचे कष्ट, त्यांच्या कामाची जाण ठेवून येत्या २० नोव्हेंबर रोजी सुहास बाबर यांनाच बहुमताने विजयी करावे. सुहास भैय्याला साथ हीच भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन केले. आटपाडीचे तानाजी पाटील यांना राज्य स्तरावर संधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच शासनाने टेंभू योजनेला स्वर्गीय अनिल बाबर यांचे नाव दिल्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.