एकवेळ मला विधानसभेत पाठवा, मतदरसंघाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; दिपकआबा साळुंखे पाटील

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघेच दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. 18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील जैनवाडी, शेंडगेवाडी, केसकरवाडी गावात प्रचार सभा संपन्न झाली.

तळागाळातील आणि सामान्य लोकांपर्यंत आम्ही रोज पोहोचत आहोत. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आम्ही ऐकून घेत आहोत. लोकांना विकास हवा आहे. फक्त आश्वासन नको तर ज्या काही त्यांच्या मोजक्या समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्यात असं लोकांकडून सांगण्यात येत आहे. मतदारसंघातील ज्या काही जनसामान्यांच्या समस्या आहेत. त्या सोडवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करीत आहे. जनतेची सेवा करण्याची एकवेळ संधी द्यावी, पुढील पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करण्याचं अभिवचन देत सर्वसामान्य लोकांच्या, तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्यानं सोडवणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.

पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, सांगोला विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकासाचा कायापालट करण्यासाठी डोळ्यासमोर व्हिजन ठेवले आहे. शेतीला नीरा उजवा कालव्याचे पाणी कायमस्वरुपी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शहाजीबापूंनी निवडणुक पैशात मोजायला सुरुवात केली तर तीन वर्षापूर्वी आलेले बाबासाहेब देशमुख वारसदार म्हणून मते मागत आहेत. एकवेळ मला विधानसभेत पाठवा, मतदरसंघाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही.

बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मतदारसंघात पाच एमआयडीसी आणून ५० हजार कोटी रुपयांचा निधी आणणार आहे. दुधाला ५ रुपयांचे अनुदान देण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा मी केली होती. निवडून आल्यावर प्रत्येक गावात दर महिन्याला जनता दरबार आयोजित करून जनतेच्या प्रश्नांचा जागीच निपटारा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.