जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘लक्ष्मी’ दर्शन जोरात सुरु…

विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Elections) जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ‘लक्ष्मी’ दर्शन जोरात सुरू झाले आहे.आचारसंहिता पथकाला थांगपत्ताही लागू न देता प्रमुख कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांच्या घरात त्या घरातील मते किती, याचा हिशोब करून प्रती मतदान पाकिटे किंवा ‘गिफ्ट कूपन्स’ देणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

दरम्यान, ज्या मतदारसंघात चुरशीची लढत आहे, ज्याठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांत ‘करो या मरो’ असे चित्र आहे, त्या मतदारसंघांत असे प्रकार जोरात सुरू असून, रात्री या प्रकारांवर विरोधकांचे लक्ष्य असल्याने दुपारची संधी साधून हे कार्य उरकले जात आहे.विधानसभेच्या दहा जागांसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. या सर्वच मतदारसंघांत प्रमुख लढत असलेल्या उमेदवारांत ‘काँटे की टक्कर’ आहे.

महाविकास (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती असा जरी सामना असला तरी चंदगड, राधानगरी, करवीरमध्ये अपक्षांमुळे तर हातकणंगले, शिरोळमध्ये तिरंगी लढतीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. विद्यमानांसह काही माजी आमदारांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याने त्यांच्याकडून ‘करो या मरो’प्रमाणे यंत्रणा कार्यरत झाली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक भेटीगाठी, गावांचे दौरे, दुसऱ्या टप्प्यात राज्य व राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या सभा, पदयात्रा आणि कोपरा सभांनी वातावारण ढवळून निघाले.

आता मतदानाला दोन दिवसांचा अवधी राहिल्यानंतर ‘लक्ष्मी’ दर्शनाचा खेळ सुरू झाला आहे. विरोधी उमेदवार किती देणार त्यापेक्षा जास्त आपण द्यायचे, या इर्ष्येपोटी थेट पाकिटेच घरोघरी पोहचवली जात आहेत. रोख रक्कम देण्यातील अडचणी आणि धोका ओळखून काही उमेदवारांकडून भेटवस्तूंची कूपन्स पोहच केली जात आहेत. चुरशीचा सामना असलेल्या मतदारसंघांत हे प्रकार अधिक असून, त्यातून मतदारांची मात्र चंगळ होऊ लागली आहे.