खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघात सुहास बाबर यांना असणारी सहानुभूती, स्व. अनिल बाबर यांनी केलेली टेंभू योजनेचे कामे, सुहास बाबर यांनी अनिल बाबर यांच्या पश्चात विटा शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी ८७ कोटींचा आणलेला निधी, त्याचबरोबर मतदारसंघातील सर्वांगिण विकासासाठी १३५० कोटींचा आणलेल्या निधीतून मतदारसंघातील विकासाला दिलेली चालना, ही त्यांची जमेची बाजू ठरली.
या निवडणूकीत त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे ‘खानापूर’चा किल्ला सर केला.सुहास बाबर यांना तब्बल ७८ हजार १७७ मते मिळाली. ‘मविआ’चे वैभव पाटील व राजेंद्र देशमुख यांचे पानिपत झाले. बाबर यांनी घेतलेले मताधिक्य पाटील – देशमुख यांना आत्मचिंतन करायला लावणारे ठरले. बाबर हे राजकारणात येऊ पाहणाऱ्यांचे आयडाॅल ठरले आहेत.सुहास बाबर यांच्यामागे आटपाडीचे तानाजी पाटील व विट्यातून मनमंदीरचे अशोक गायकवाड, धर्मेश पाटील, सुशांत देवकर यांच्यासह ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांनी ताकद उभा केली.
शिवाय मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सभा घेऊन बाबर यांना ताकद दिली. शिवाय या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणी आहेत. त्याचा प्रभाव निवडणूकीत प्रामुख्याने दिसून आला. पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेतली. मात्र मतदारांना ते पसंत पडले नाही, हे मतपेटीतून दिसून आले.