मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचे बोलले जात आहे. हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मंत्रिपद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी अधिवेशनात जयंत पाटील यांनी ‘योग्य वेळी, योग्य निर्णय’ असं विधान केले होते. दरम्यान, आता एक मंत्रिपद राखील ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राखील ठेवलेल्या मंत्रिपदावरुन बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मागेही एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी ठेवले होते त्यावेळी त्यांनी फार विचार केला.
नंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं त्यावेळी त्यांना तिथं जाण्याची गरज नाही असं वाटलं. पण आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती, योग्य निर्णय हे तेच बोललेत. त्यामुळे आता लवकरच योग्य निर्णय होईल. त्यांना अस्वस्थ होणे सहाजिकच आहे. पण ते नक्कीच येतील. डिसेंबरच्या अखेर ते नक्की येतील, असा मोठा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला.